Sunday, February 21, 2010

एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही - सदानंद कोचे


जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी सर्व सामान्य नागरिक मोठ्या अपेक्षा घेवून येत असतात. त्या सर्वांना विकासाच्या कक्षेत सामावून घेण्याचे कार्य जिल्हा परिषदेमार्फत होत असते. ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, सर्वशिक्षा अभियान, आरोग्य सेवा, तसेच बचत गटांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचा विकास करण्यावर जिल्हा परिषद सातत्याने भर देत असतात. या अनुषंगाने बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद कोचे यांनी आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेला 'आभावाकडून प्रभावाकडे' नेले आहे. या विषयी त्यांनी महान्यूजशी केलेल्या संवादाचा संक्षिप्त आढावा...
प्रश्न -आपण पदभार स्विकारल्यापासून केलेल्या महत्वपूर्ण कामाविषयी थोडक्यात काय सांगाल ?
उत्तर - ऑगस्ट २००८ मध्ये रुजु झालो तेव्हा, जिल्हयाच्या सार्वजनिक स्वच्छतेचे कार्य १० टक्के होते. स्वच्छता हा नागरिकांच्या थेट आरोग्याशी संबंधीत विषय असल्याने यावर प्राधान्याने काम करुन ही टक्केवारी २६ टक्यावर पोहचली आहे. स्वच्छतेची कामे ४२ टक्याच्यावर करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेचा आहे. स्वच्छता व शिक्षण या दोन विषयावर लक्ष केंद्रीत करुन कामास सुरुवात केली. त्याचा सकारात्मक परिणाम लवकरच समोर येईल. जिल्हा परिषदेला आयएसओ करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून परिसर स्वच्छ त्याचप्रमाणे पारदर्शकता या बळावर जिल्हा परिषद लोकाभिमुख होताना दिसत आहे. जिल्हयातील सामान्य व गरजू विद्यार्थ्यांपर्यत शिक्षणाची गंगा पोहचविण्याचा मुख्य उद्देश आहे.
प्रश्न - निर्मल ग्राम व स्वच्छता मोहिमेत आपल्या जिल्हयाची प्रगती कशी आहे ?
उत्तर - निर्मल ग्राम योजनेत मागील काही वर्षात जिल्हयाने समाधानकारक प्रगती केली असून यावर्षी ११६ प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे निर्मल ग्राम ही संकल्पना लोकात रुजताना दिसत आहे. जोपर्यत नागरिकांचा सक्रीय सहभाग वाढत नाही तोपर्यत निर्मल ग्राम सारख्या महत्वाच्या योजनांचे यश अधोरेखीत होत नाही, मात्र समाधानाची बाब अशी की, बुलडाणा जिल्हयातील बहुतांश गावांना आपण या योजनेत सहभागी झालो पाहिजे. एवढेच नाही तर, पारितोषिकही मिळविले पाहिजे असे स्वयंत्स्फुर्तपणे वाटायला लागले आहे. स्वच्छता मोहिमेबाबत सांगायचे झाल्यास जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभाग प्रमुखांनी गावांना भेटी देवून पाहणी करावी असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आपण स्वत:ही अनेक गावांना भेटी देवून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देतो.
प्रश्न - आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल थोडक्यात काय सांगाल ?
उत्तर - आरोग्याच्या बाबतीत जिल्हयातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रसुती ही रुग्णालयातच व्हावी यावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. नागरिकांनी रुग्णालयात यावे असे असले तरी डॉक्टर नागरिकांच्या दारी या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा पोहचविण्याचे महत्वाचे काम जिल्हा परिषदेच्या मार्फत केल्या जात आहे. शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषदेचा सहभाग अतिशय महत्वाचा असतो. ग्रामीण भागात शिक्षकांनी मुख्यालयी तसेच शाळेत हजर राहावे अशा सूचना दिल्या नंतर त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळेच्या खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच वाढताना दिसत आहे.
प्रश्न - जलस्वराज्य व पाणी पुरवठा योजनेबाबत जिल्हा परिषदेने केलेले महत्वपूर्ण कार्य ?
उत्तर - जिल्हयात ५४२ पाणी पुरवठा योजना आहेत. त्यातील ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित योजनांची कामे येत्या वर्षभरात करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न राहणार आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना पुर्णत्वास गेल्या असून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले सर्व प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यावर आपला भर राहणार आहे. इंदिरा आवास योजना व अल्पसंख्यांकासाठीची घरे पूर्ण करण्यात आली आहेत.
प्रश्न - महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आपले संकल्प काय ?
उत्तर - महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त जिल्हा परिषदेने एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही असा संकल्प केला आहे. केवळ विद्यार्थीच नाही तर गाव-पाड्यातील कुठलाही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी जिल्हा परिषदेतर्फे घेतली जाईल. त्याचबरोबर वृक्ष लागवड व संगोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येईल. यासाठी जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. बचत गटाचेही यासाठी सहकार्य घेतले जाईल. या संकल्पात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आहे.
ravi gite

Tuesday, February 16, 2010

लोकराज्य शाळा-एक संस्कार

परवा बुलढाण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. आमचे बुलढाण्याचे उत्साही जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते म्हणाले, आपण बुलढाण्यामध्ये एक लोकराज्य शाळा केली आहे. त्या शाळेला भेट देऊ या का? मी म्हटलं हो, नक्कीच, मीही या शाळेबद्दल खूप ऐकलं आहे. चला जाऊ या! बुलढाण्यातल्या कोलवड येथील विद्याविकास शाळेत आम्ही सकाळी पोहोचलो. शाळेचा मोठा हॉल आहे. या हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वच्छ गणवेशात ५ वी ते १० वी ची मुलं-मुली बसलेली होती. वातावरण अतिशय उत्साही होते. शाळेचे अध्यक्ष सुभाषराव पाटील यांनी आमचे स्वागत केले. माझ्या बरोबर नवाकाळच्या संपादक श्रीमती जयश्री खाडीलकर होत्या. अमरावती विभागाचे उपसंचालक बी. एन. गवारी हेही आले होते. शाळेचे मुख्याध्यापक सुनील जवंजाळ हिरीरीने माहिती देत होते. या शाळेत ऑडिओ व्हिडिओ व्यवस्था आहे. महत्वाचे विषय शिकविताना या माध्यमाचा वापर केला जातो. या शाळेत ८५० विद्यार्थी आहेत. शाळेच्या व्यवस्थापनाशी चर्चा करुन रवी गितेंनी सर्व विद्यार्थ्यांना लोकराज्यचे वर्गणीदार केले. घरोघरी लोकराज्य या मोहिमेत अधिकाधिक वर्गणीदार करण्यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्नशील असतो. लोकराज्यमधल्या माहितीचा सर्वात जास्त उपयोग स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना होतो. कुठल्याही स्पर्धा परीक्षेत शासनाच्या योजनांविषयी प्रश्न असतोच आणि त्या सर्व योजनांची माहिती फक्त लोकराज्यमध्ये असते. मला या शाळेचे फार कौतुक वाटते. विद्यार्थी घडवितांना फक्त घोकंपट्टी न करता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे या शाळेत कटाक्षाने बघितले जाते. लोकराज्यचे अंक मुले वाचतात की नाही यावर शाळेत वर्षातून २ वेळा परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे फक्त वर्गणीदार करणे हेच उद्दिष्ट नाही तर मुले अंक वाचतात का नाही याकडेही बघितले जाते. मी यावेळी मुलांना एक गोष्ट सांगितली. इंग्लंडमध्ये माझे एक स्नेही गेले होते. त्यांच्याकडून तिथल्या वाचनालयाचे एक पुस्तक हरवले. त्यांनी पुस्तकाची रक्कम वाचनालयाला देऊ केली. ग्रंथपाल म्हणाले, पुस्तक हरवले म्हणजे नेमके काय झाले? त्यावर ते म्हणाले, माझे पुस्तक प्रवासात चोरी गेले. बॅग चोरी गेली त्यात पुस्तक होते. ग्रंथपाल म्हणाले, आमच्या देशात जर कोणाला कुठल्याही वाचनालयाचे पुस्तक सापडले तर ते तो परत करतो. कुणीही आपल्याकडे वाचनालयाचे पुस्तक ठेवत नाही. माझ्या स्नेह्याचा यावर विश्वास बसला नाही. ग्रंथपाल म्हणाले, आठ दिवस वाट बघू या. तिसर्‍या दिवशी सकाळी ग्रंथपालांचा फोन आला की, पुस्तक परत आलेले आहे. मुलांनी वाचनावर प्रेम करावे आणि पुस्तकेही नीट वापरावीत. वाचनालयाची पुस्तके वेळेवर परत करावीत असा संस्कार माझ्या मनावर झाला. तो मी त्यांना सांगितला. रवी गिते यांच्यासारखे जिल्हा माहिती अधिकारी वेगळ्या प्रकारचे काम करतात आणि लोकराज्य वर्गणीदार वाढवित असतानाच नव्या पिढीवर संस्कारही करतात याचा मला विलक्षण आनंद होतो.
श्रद्धा बेलसरे-खारकर