Monday, March 15, 2010

किटक यात्रा




बोथा जंगलात भटंकतीला जाऊयात का अशी विचारणा करणारा दूरध्वनी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांचा आला. रविवार असल्यामुळे तात्काळ हो म्हणालो. सोबत किटक संशोधक प्रा.अलोक शेवडे आहेत, अशी पृष्टी त्यांनी जोडताच किटक संशोधनात दिवस व्यतीत होणार याची कल्पना आली. वनभ्रमंती किती सुखावह असते याचा पहिल्यांदा अनुभव घेतला. छान घनदाट हिरव्यागार वनश्रींनी नटलेले, काट्याकुट्यात, दगडधोंड्यात, वेड्यावाकड्या पाऊलवाटात हरवलेलं, गवत फुलांनी, लता-वेलींनी गजबजलेलं अस जंगल पाहलं की, आठवण होते ती वन्य प्राण्यांची. पण त्याहीपेक्षा किटकांचे विश्व अजब आहे, अनोखे आहे. प्रा.अलोक शेवडे सांगत होते. या किटक विश्वात भ्रमती करावी म्हणून निसर्ग नवलाई किटक यात्रा प्रारंभ केली अन् पाहता पाहता ४०० च्या वर किटकांनी या यात्रेत हजेरी लावली, इती प्रा.शेवडे.आपल्या छंदाला, मनस्वी स्वभावाला योग्य वळण दिलं तर त्यातून व्यासंग निर्माण होते व आपल्यातील संशोधक वृत्ती जागृत होऊ शकते. याचा उत्तम प्रत्यय बुलडाण्यातील एका इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकाने आणून दिलाय. त्यांनी किटकांमध्ये सौंदर्य शोधलंय ... ! आणि ते कॅमे-यात बंदीस्त केलय. प्रा.अलोक शेवडे यांनी केवळ छंद म्हणून आजुबाजुला दिसणार्‍या किटकांचे फोटो टिपायला सुरुवात केली आणि आतापर्यंत जवळपास साडेचारशे पेक्षा जास्त किटकांचे दीड हजार छायाचित्र त्यांनी टिपली आहेत. केवळ पुस्तकी अभ्यासात न रमता सौंदर्यवादी दृष्टीकोन समोर ठेवून जोपासलेला हा छंद कोणालाही संशोधनाकडे नेऊ पाहतोय.या यात्रेत आम्ही असंख्य किटकांना भेटलो. किटकांचे वर्णन व त्यांचे गुणधर्म शेवडे इतक्या सहजतेने सांगतात की, तो किटक यांना रोज भेटतो असेच वाटते. किटकांच्या किती जाती असाव्या याचा अंदाज लावणे कठीणच. अनेक किटक त्यांनी नव्याने शोधून काढलेत आणि त्यांना लिलया कॅमेराबध्द केलं आहे. रॉबर, गोल्ड ग्रीन लिफ बीटस्, कंमाडो मॉथ, आशियाई जायंट स्पायडर, यलो बॅन्डेड सॉटिपिड, गॉगलधारी किटक, नाकतोडा, रेनबो ब्ल्यु हार्नेट अशा कितीतरी किटकांचे अप्रतिम छायाचित्र शेवडेंच्या संग्रहात आहेत.मोकळा वेळ मिळताच मी जंगलाची वाट धरतो व किटकांच्या सानिध्यात रमतो असे ते सांगतात तेव्हा किटकवेड्या माणसाच भावविश्व डोळ्यासमोर येते. एकाच प्रजातीमध्ये तीन रंगाचे नाकतोडे केवळ शेवडे यांच्याच संग्रहात सापडतात. लिफ हुडेड ग्रास हॉपर अर्थात शिरस्त्राणधारी नाकतोडा असे त्याचे नाव.मात्र त्याचे सुरेख छायाचित्र पाहताच पानावर खरोखरच शिरस्त्रान ठेवल्याचा भास होतो. ऐन २६ जानेवारीला त्यांनी तिरंगा रंगाचा नाकतोडा कॅमेर्‍यात बदीस्त केला आहे. तो पाहिल्यावर त्यांच्या कॅमेर्‍याचा हेवा वाटतो. प्रा.शेवडे प्रबोधन कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. तसेच ते अमरावती बोर्डाचे पर्यावरण विषयाचे तज्ज्ञ साधन व्यक्ती आहे. आपले अध्यापन कार्य सांभाळून प्रा.शेवडे आपला फावला वेळ जंगल भ्रमंतीत व्यतीत करतात. निसर्गाशी मानवाचे असलेले नाते अधिक घट्ट करायचा ते मनस्वी तळमळीने प्रयत्न करतात. किटक मैत्री बरोबरच ते सर्पमित्र देखील आहेत. किटकांना तर ते आराध्य दैवतच मानतात. या बाबतीत त्यांचे मत अतिशय संवेदनशील व पर्यावरण पूरक आहे. वन्य पशू-पक्षी यांच्या बरोबरच किटकही समृध्द जंगलाचे निदर्शक आहेत व सूक्ष्म अन्न भक्ष्य म्हणून त्यांचे संवर्धन अत्यावश्यक आहे, असे ते मानतात.त्यांच्या संग्रही सध्या केवळ नाकतोड्यांचे जवळपास १०० प्रकार आहेत, यावरून त्यांच्या छंदिष्ट संशोधनाची चुणूक दिसते. भटकंती दरम्यान आढळलेला प्रत्येक लहान मोठा किटक त्यांनी आजवर कॅमेराबध्द केलाय. यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम थक्क करणारे आहेत. Insect Photography हे अवघड प्रकरण त्यांनी कसे पेलले याचे रोचक वर्णन ते आपल्या स्लाईड-शो-टॉक-शो मधून करतात तेव्हा किटकांचे रोमांचकारी विश्व उभे राहते. आपल्या सभोवतालचा प्रत्येक सूक्ष्मजीव अतिशय मनोवेधक असतो याचे प्रत्यंतर त्यांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून आल्याशिवाय राहत नाही. या आपल्या कलेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्याचे मोलाचे कार्य ते करत आहेत. आपल्या प्रत्यक्ष कृतीतून निसर्ग संवर्धनाचे धडे देत असतांनाच लोकांच्या मनात सौंदर्यवादी दृष्टीकोन विकसित करण्याचे अतिशय मौलिक कार्य त्यांच्या हातून घडत आहे. या विषयाच्या अभ्यासकांनी एकवेळ त्यांच्या किटक संग्रहाला आवश्य भेट द्यावी. बोथा जंगलातील ही किटक यात्रा केव्हाच संपू नये असेच वाटत होते.
रवि गिते

Thursday, March 11, 2010

नाव दगडवाडी हाती विकासाचा वाळा


'गाव करी ते राव न करी' अशी आपल्याकडे म्हण आहे. दगडवाडीला भेट दिल्यानंतर ही म्हण त्याच गावासाठी तयार झाली असेल असे मनोमन वाटते. शासनाच्या योजना राबविण्यासाठीचा जो पुढाकार लागतो त्याचा पुरेपूर अनुभव या गावाला भेट दिल्यानंतर येतो. हागणदरीमुक्त गाव, तंटामुक्त गाव, वनग्राम, स्वच्छता ग्राम, आदर्श ग्राम, जलभूमि अभियान, पाणलोट विकास, बचतगट चळवळ अशा कितीतरी अंगाने या गावाची ओळख आहे.आता आदर्श कुटूंब अभियान राबवून दगडवाडीने सर्व योजनांच्या अंमलबजावणीचा ताळेबंदच जाहीर केला आहे. गावातील महिला व नागरिक ध्येयाने झपाटल्यानंतर गावचा कसा कायापालट होतो याचे उत्तम उदाहरण दगडवाडी आहे. नाव जरी दगडवाडी असले तरी गावकर्‍यांच्या हाती विकासाचाच वाळा आहे. दगडवाडी (रघुवीर वाडी) ता. देऊळगावराजा जि. बुलडाणा, या गावाने ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम, पाणलोट, तंटामुक्ती या क्षेत्रात भरीव काम केले आहे. आता 'आदर्श कुटूंब' हा अभिनव प्रयोग राबविला. गावातील नागरिकांनी स्वयंस्फुर्तपणे स्वच्छता चळवळ राबवावी हा या मागचा हेतू आहे. वरवर पाहता हे अभियान केवळ गावापूरते असले तरी या अभियानाने सरकारला एक सुंदर योजना दिली आहे. एरवी शासन जनतेला योजना देते प्रशासनाच्या माध्यमातून ती राबिविली जाते. मात्र दगडवाडी गावाने 'आदर्श कुटूंब' ही अभिनव योजना देतांना नागरिकांनी स्वयंप्रेरणेने केलेल्या कार्यामुळे गावाचा कसा कायापालट होतो हेही दाखवून दिले आहे. यासाठी गावकर्‍यांनी एक प्रश्नावली तयार केली व नागरिकांना वितरीत केली. ही प्रश्नावली म्हणजे या योजनेचा मसुदा ठरावा अशीच आहे. प्रश्नावलीत शासनाच्या ५ योजनांची अंमलबजावणी दडली आहे. शौचालय, सांडपाणी नियोजन, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण व तंटामुक्ती अशा पाच योजनांची स्वयंपूर्ण अंमलबजावणी म्हणजे 'आदर्श कुटूंब' योजना आहे. अशा स्वप्नाचा गावकर्‍यांनी राबविलेला हा राज्यातील एकमेव प्रयोग ठरावा. एवढेच नाहीतर घरपट्टी भरणार्‍या कुटूंबांनाच या योजनेत सहभागी होता येईल. याचा अर्थ ग्रामपंचायतीच्या उत्पनात भर व कर भरण्याची सवय लागते. यात सवय हा भाग अतिशय महत्वाचा आहे. कुठलीही योजना यशस्वी होण्यासाठी नागरिकांना चांगल्या कामाची सवय लागणे गरजेचे असते. आणि दगडवाडीच्या नागरिकांनी ही सवय स्वत:हून लावून घेण्याचा निर्धार केला आहे. हे या योजनेचे यश व महत्व अधोरेखित करते. आदर्श कुटूंब स्पर्धेत प्रथम येणार्‍या कुंटूबास ५ हजार रुपयांचे तर द्वितीय व तृतीय अनुक्रमे ३ हजार १ व २ हजार १ रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. रोख रकमेचा भाग प्रोत्साहित करण्यासाठी असला तरी त्यानिमित्ताने नागरिकांत परिवर्तनाची उमेद जागी होते हे विशेष. या स्पर्धेच्या बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला. गावात पाय ठेवताच गावच्या समृध्दतेची जाणीव झाली. अतिशय नेटके व स्वच्छतेचा वसा घेणारे गाव म्हणून दगडवाडीचा परिसरात लैकिक आहे. त्याचबरोबर पाणलोट क्षेत्रात काम करणारे गाव म्हणूनही परिचित आहे. परंतू आज 'आदर्श कुटूंब' स्पर्धेच्या माध्यमातून या गावाने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेवरून नजर टाकल्यास अनेक योजनांची फलश्रुती असल्याचे जाणवते. यासाठी या गावचे सरपंच श्रावण डोईफोडे व गजानन घुगे याची कल्पकता व मेहनत महत्वाची आहे. यावर्षी सहदेव ओंकार घुगे, शंकर नामदेव जायभाये व त्र्यंबक जायभाये यांच्या कुटुंबांना आदर्श कुटुंब पुरस्कार मिळाला आहे. गावकर्‍यांनी गावकर्‍यांसाठी सुरु केलेल्या या अभिनव योजनेत नागरिकांनी स्वयंस्फुर्त सहभागी होणे व पुरस्कार प्राप्त करणे इतरांसाठी आदर्शच ठरले आहे. हे गाव एवढयावरच थांबले नाही. तर बचत गटाची मोठी फळी या गावाची जमेची बाजू आहे. गावात महिला व पुरुषांचे एकूण ३५ च्या वर बचत गट विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. यात सर्वात जास्त काम त्यांनी पाणलोट क्षेत्रात केले आहे. नागरिकांनी बचतगटाच्या माध्यमातून केलेल्या पाणलोटच्या कार्यामुळे २० द्राक्ष बागासह ४० फळबागा डौलाने अभ्या आहेत. पूर्वी सिंचनाच्या पाण्यासाठी भटकंती करणारे दगडवासिय आता बागा फुलवत आहेत. गावातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून पाणलोट विकासात खुप मोठी कामे केली आहेत, यामुळे पाण्याच्या पातळीत खूप मोठी वाढ झाली आहे. महिलांना प्रोत्साहन म्हणून गावात १२५ गॅस सिलेन्डरचे वाटप करण्यात आले. इंडोजर्मन प्रकल्पाच्यावतीने कुटूंबाला स्वच्छ पाणी मिळावे यासाठी गावात वाटर-फिल्टर पूरविण्यात आले. गावात राबविण्यात येत असलेल्या सर्व विकास कामांत व योजनांत महिलांचा सक्रीय सहभाग ही या गावाची दुसरी जमेची बाजू आहे. दुसरे म्हणजे नागरिकांच्या विकासांच्या कक्षा वाढाव्यात यासाठी इतर आदर्श गावांना सहली काढून तेथील विकास कामाची पाहणी करण्याचा उपक्रमही गावकरी नित्यनेमाने राबवित असतात. ही किमया एका दिवसाची निश्चितच नाही. या मागे गावकर्‍यांची मेहनत व एकी आहे. गावाचे नाव दगडवाडी असले तरी गावात विकासाचा झंझावात आहे. आता या गावाचे नाव जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पोहचले आहे. दगडवाडीच्या 'आदर्श कुटूंब' उपक्रमाचे राज्यातील सर्वच गावांनी अनुकरण करायला काहीच हरकत नाही. 'जे जे (गावच्या विकासासंबधी) आपणाशी ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन' या संत वचनाची अनुभूती दगडवाडीत आली.
रवी गिते

Tuesday, March 2, 2010

दक्ष नागरिक अभियान राबविणार - डॉ. रविंद्र शिसवे


जिल्हा पोलीस दलाला कुटुंबाचे स्वरुप देवून ,साधन सुचितेवर अपार श्रध्दा ठेवणा-या डॉ. रविंद्र शिसवे यांनी पोलीसांचे मनोबल उंचावले आहे. त्याचबरोबर. कर्तव्याला नैतिकतेचे अधिष्ठाण दिल्यास जनता व पोलीस यांच्यातील संबध व संवाद पसायदानासारखा होईल असा त्यांचा विश्वास आहे व त्या अनुषंगाने कामास सुरुवात केली असल्याचे त्यांनी महान्यूजला सांगितले.

प्रश्न- जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचा थोडक्यात आढावा कसा घ्यावा.

उत्तर- २००९ साल हे निवडणूकीचे वर्ष असल्याने पोलीस दलाची ख-या अर्थाने परीक्षा होती. परंतु लोकसभा व त्या पाठोपाठ असलेल्या विधानसभा निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था नीट हाताळण्यात जिल्हा पोलीस दलाला यश मिळाले . या निवडणूकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्यासोबतच गणेशोत्सव, नवरात्र, मोहरम, दिवाळी हे महत्वाचे उत्सव आलेत. आणि आताचा विदर्भ बंद या सगळया पार्श्वभुमीवर जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेला छेद देणारी कुठलीच घटना घडली नाही. सर्व शांततेत पार पडले. याचे श्रेय जिल्हयातील संयमी जनता व पोलीस दलातील अधिकारी कर्मचा-यांना आहे. पोलीस व जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाल्यास प्रशासनाचे काम सोयीचे होते. आणि त्यावरच आमचा अधिक भर आहे.

प्रश्न - पोलीस दलातील कामाचा वाढता ताण कमी करण्यासाठी काय नियोजन केले आहे.

उत्तर- पोलीस दलात कामाच्या निश्चित वेळा नसतात तसेच कुठलीही घटना सांगून घडत नाही. मात्र नागरीकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे पोलीस दल सक्षम व प्रभावी असणे गरजेचे आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी नियोजन करावेच लागते. त्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यात येत आहे. पोलीस कुंटुंब मेळावा, क्रीडा स्पर्धा, सुप्त गुणांना वाव देणारे कार्यक्रमाचे पोलीस मुख्यालयात आयोजन करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पोलीसांवरील ताण तर कमी होतोच त्याचबरोबर कम्युनिकेशन गॅपसुध्दा दूर होण्यास मदत झाली आहे. . सातत्याने येणारी नवनवीन आव्हाने व बदलती परिस्थती यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशिक्षण हा चांगला उपाय आहे. क्षमतावृध्दी व प्रशिक्षणामुळे सक्षम दल तयार होते. त्यादृष्ठीने कार्यक्रम राबविले जात आहेत. अशा कार्यक्रमामुळे पोलीसांत आपलेपणाची भावना निर्माण व्हायला मदत होते.

प्रश्न- तंटामुक्ती ग्राम योजनेत जिल्हयाचा सहभाग वाढवा यासाठी काय उपाययोजना केल्या.

उत्तर- यावर्षी पोलीस व महसुल विभागाने नियोजबध्द कार्यक्रम आखुन प्रत्येक गावात ही योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे. त्यानुसार यावर्षी पंचविस टक्के गावे तंटामुक्त होतील असा विश्वास आहे. त्याचबरोबर वैयक्तिक तंटे व पारंपारीक तंटे मिटविण्यावर मोठया प्रमाणात भर दिल्या जात आहे. प्रत्येक गावात जनजागृती मोहीम तसेच नागरीक व यंत्रणा यांच्यात संवाद साधण्याचा प्रयत्न होत आहे. याचे सकारात्मक परीणाम लवकरच दिसुन येणार आहेत.

प्रश्न- सिंधुदुर्ग जिल्हयात आपण अनेक नवीन उपक्रम राबविले आहेत या जिल्हयासाठी कुठला उपक्रम डोळ्यासमोर आहे.

उत्तर- पोलीस दल व नागरीक यांच्या संयुक्त सहभागातुन कायदा व सुव्यस्था नियंत्रीत ठेवण्यासाठी दक्ष नागरीक अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस, जनता व प्रशासन यांच्या सक्रीय सहभागातुन हे अभियान राबविले जाणार आहे. पोलीस करत असलेल्या कामांचा प्रतिक्रिया ब-याच वेळा दृष्य स्वरुपात समोर येत नाही. या अभियानात नागरीकांचा सक्रीय सहभाग राहणार असल्यामुळे दृष्यस्वरुपात प्रतिक्रिया मिळणार आहे. शासनाच्या सर्व फोरमवरुन दक्ष नागरीक अभियान राबविण्याची संकल्पना आहे. कायदा व सुव्यवस्था यात नागरीकांचाही महत्वाचा सहभाग असुन या अभियानाच्या माध्यमातुन तो ठळकपणे अधोरेखित होणार आहे. त्या सोबतच पोलीस प्रशासनाच्या कामात सुसुत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.पोलीस विभाग हा जनतेच्या सेवेकरीता आहे. तो अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा यावर काम सुरु आहे. कार्यालयीन कामकाज संगणकीय करण्याची प्रक्रिया पोलीस मुख्यालयात सुरु झालेली आहे. पोलीस व जनता यांच्यात भितीचे नाही तर लोकसंवादाचे नाते निर्माण व्हावे यादृष्टीने सातत्याने प्रयत्न केले जाणार आहेत. या मोहिमेत जनतेनी स्वयंस्फूर्त सहभाग घेतल्यास दक्ष नागरिक अभियान निश्चित यशस्वी होईल.असा विश्वास वाटतो.