
जिल्हा पोलीस दलाला कुटुंबाचे स्वरुप देवून ,साधन सुचितेवर अपार श्रध्दा ठेवणा-या डॉ. रविंद्र शिसवे यांनी पोलीसांचे मनोबल उंचावले आहे. त्याचबरोबर. कर्तव्याला नैतिकतेचे अधिष्ठाण दिल्यास जनता व पोलीस यांच्यातील संबध व संवाद पसायदानासारखा होईल असा त्यांचा विश्वास आहे व त्या अनुषंगाने कामास सुरुवात केली असल्याचे त्यांनी महान्यूजला सांगितले.
प्रश्न- जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचा थोडक्यात आढावा कसा घ्यावा.
उत्तर- २००९ साल हे निवडणूकीचे वर्ष असल्याने पोलीस दलाची ख-या अर्थाने परीक्षा होती. परंतु लोकसभा व त्या पाठोपाठ असलेल्या विधानसभा निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था नीट हाताळण्यात जिल्हा पोलीस दलाला यश मिळाले . या निवडणूकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्यासोबतच गणेशोत्सव, नवरात्र, मोहरम, दिवाळी हे महत्वाचे उत्सव आलेत. आणि आताचा विदर्भ बंद या सगळया पार्श्वभुमीवर जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेला छेद देणारी कुठलीच घटना घडली नाही. सर्व शांततेत पार पडले. याचे श्रेय जिल्हयातील संयमी जनता व पोलीस दलातील अधिकारी कर्मचा-यांना आहे. पोलीस व जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाल्यास प्रशासनाचे काम सोयीचे होते. आणि त्यावरच आमचा अधिक भर आहे.
प्रश्न - पोलीस दलातील कामाचा वाढता ताण कमी करण्यासाठी काय नियोजन केले आहे.
उत्तर- पोलीस दलात कामाच्या निश्चित वेळा नसतात तसेच कुठलीही घटना सांगून घडत नाही. मात्र नागरीकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे पोलीस दल सक्षम व प्रभावी असणे गरजेचे आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी नियोजन करावेच लागते. त्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यात येत आहे. पोलीस कुंटुंब मेळावा, क्रीडा स्पर्धा, सुप्त गुणांना वाव देणारे कार्यक्रमाचे पोलीस मुख्यालयात आयोजन करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पोलीसांवरील ताण तर कमी होतोच त्याचबरोबर कम्युनिकेशन गॅपसुध्दा दूर होण्यास मदत झाली आहे. . सातत्याने येणारी नवनवीन आव्हाने व बदलती परिस्थती यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशिक्षण हा चांगला उपाय आहे. क्षमतावृध्दी व प्रशिक्षणामुळे सक्षम दल तयार होते. त्यादृष्ठीने कार्यक्रम राबविले जात आहेत. अशा कार्यक्रमामुळे पोलीसांत आपलेपणाची भावना निर्माण व्हायला मदत होते.
प्रश्न- तंटामुक्ती ग्राम योजनेत जिल्हयाचा सहभाग वाढवा यासाठी काय उपाययोजना केल्या.
उत्तर- यावर्षी पोलीस व महसुल विभागाने नियोजबध्द कार्यक्रम आखुन प्रत्येक गावात ही योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे. त्यानुसार यावर्षी पंचविस टक्के गावे तंटामुक्त होतील असा विश्वास आहे. त्याचबरोबर वैयक्तिक तंटे व पारंपारीक तंटे मिटविण्यावर मोठया प्रमाणात भर दिल्या जात आहे. प्रत्येक गावात जनजागृती मोहीम तसेच नागरीक व यंत्रणा यांच्यात संवाद साधण्याचा प्रयत्न होत आहे. याचे सकारात्मक परीणाम लवकरच दिसुन येणार आहेत.
प्रश्न- सिंधुदुर्ग जिल्हयात आपण अनेक नवीन उपक्रम राबविले आहेत या जिल्हयासाठी कुठला उपक्रम डोळ्यासमोर आहे.
उत्तर- पोलीस दल व नागरीक यांच्या संयुक्त सहभागातुन कायदा व सुव्यस्था नियंत्रीत ठेवण्यासाठी दक्ष नागरीक अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस, जनता व प्रशासन यांच्या सक्रीय सहभागातुन हे अभियान राबविले जाणार आहे. पोलीस करत असलेल्या कामांचा प्रतिक्रिया ब-याच वेळा दृष्य स्वरुपात समोर येत नाही. या अभियानात नागरीकांचा सक्रीय सहभाग राहणार असल्यामुळे दृष्यस्वरुपात प्रतिक्रिया मिळणार आहे. शासनाच्या सर्व फोरमवरुन दक्ष नागरीक अभियान राबविण्याची संकल्पना आहे. कायदा व सुव्यवस्था यात नागरीकांचाही महत्वाचा सहभाग असुन या अभियानाच्या माध्यमातुन तो ठळकपणे अधोरेखित होणार आहे. त्या सोबतच पोलीस प्रशासनाच्या कामात सुसुत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.पोलीस विभाग हा जनतेच्या सेवेकरीता आहे. तो अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा यावर काम सुरु आहे. कार्यालयीन कामकाज संगणकीय करण्याची प्रक्रिया पोलीस मुख्यालयात सुरु झालेली आहे. पोलीस व जनता यांच्यात भितीचे नाही तर लोकसंवादाचे नाते निर्माण व्हावे यादृष्टीने सातत्याने प्रयत्न केले जाणार आहेत. या मोहिमेत जनतेनी स्वयंस्फूर्त सहभाग घेतल्यास दक्ष नागरिक अभियान निश्चित यशस्वी होईल.असा विश्वास वाटतो.

No comments:
Post a Comment