Thursday, March 11, 2010

नाव दगडवाडी हाती विकासाचा वाळा


'गाव करी ते राव न करी' अशी आपल्याकडे म्हण आहे. दगडवाडीला भेट दिल्यानंतर ही म्हण त्याच गावासाठी तयार झाली असेल असे मनोमन वाटते. शासनाच्या योजना राबविण्यासाठीचा जो पुढाकार लागतो त्याचा पुरेपूर अनुभव या गावाला भेट दिल्यानंतर येतो. हागणदरीमुक्त गाव, तंटामुक्त गाव, वनग्राम, स्वच्छता ग्राम, आदर्श ग्राम, जलभूमि अभियान, पाणलोट विकास, बचतगट चळवळ अशा कितीतरी अंगाने या गावाची ओळख आहे.आता आदर्श कुटूंब अभियान राबवून दगडवाडीने सर्व योजनांच्या अंमलबजावणीचा ताळेबंदच जाहीर केला आहे. गावातील महिला व नागरिक ध्येयाने झपाटल्यानंतर गावचा कसा कायापालट होतो याचे उत्तम उदाहरण दगडवाडी आहे. नाव जरी दगडवाडी असले तरी गावकर्‍यांच्या हाती विकासाचाच वाळा आहे. दगडवाडी (रघुवीर वाडी) ता. देऊळगावराजा जि. बुलडाणा, या गावाने ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम, पाणलोट, तंटामुक्ती या क्षेत्रात भरीव काम केले आहे. आता 'आदर्श कुटूंब' हा अभिनव प्रयोग राबविला. गावातील नागरिकांनी स्वयंस्फुर्तपणे स्वच्छता चळवळ राबवावी हा या मागचा हेतू आहे. वरवर पाहता हे अभियान केवळ गावापूरते असले तरी या अभियानाने सरकारला एक सुंदर योजना दिली आहे. एरवी शासन जनतेला योजना देते प्रशासनाच्या माध्यमातून ती राबिविली जाते. मात्र दगडवाडी गावाने 'आदर्श कुटूंब' ही अभिनव योजना देतांना नागरिकांनी स्वयंप्रेरणेने केलेल्या कार्यामुळे गावाचा कसा कायापालट होतो हेही दाखवून दिले आहे. यासाठी गावकर्‍यांनी एक प्रश्नावली तयार केली व नागरिकांना वितरीत केली. ही प्रश्नावली म्हणजे या योजनेचा मसुदा ठरावा अशीच आहे. प्रश्नावलीत शासनाच्या ५ योजनांची अंमलबजावणी दडली आहे. शौचालय, सांडपाणी नियोजन, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण व तंटामुक्ती अशा पाच योजनांची स्वयंपूर्ण अंमलबजावणी म्हणजे 'आदर्श कुटूंब' योजना आहे. अशा स्वप्नाचा गावकर्‍यांनी राबविलेला हा राज्यातील एकमेव प्रयोग ठरावा. एवढेच नाहीतर घरपट्टी भरणार्‍या कुटूंबांनाच या योजनेत सहभागी होता येईल. याचा अर्थ ग्रामपंचायतीच्या उत्पनात भर व कर भरण्याची सवय लागते. यात सवय हा भाग अतिशय महत्वाचा आहे. कुठलीही योजना यशस्वी होण्यासाठी नागरिकांना चांगल्या कामाची सवय लागणे गरजेचे असते. आणि दगडवाडीच्या नागरिकांनी ही सवय स्वत:हून लावून घेण्याचा निर्धार केला आहे. हे या योजनेचे यश व महत्व अधोरेखित करते. आदर्श कुटूंब स्पर्धेत प्रथम येणार्‍या कुंटूबास ५ हजार रुपयांचे तर द्वितीय व तृतीय अनुक्रमे ३ हजार १ व २ हजार १ रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. रोख रकमेचा भाग प्रोत्साहित करण्यासाठी असला तरी त्यानिमित्ताने नागरिकांत परिवर्तनाची उमेद जागी होते हे विशेष. या स्पर्धेच्या बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला. गावात पाय ठेवताच गावच्या समृध्दतेची जाणीव झाली. अतिशय नेटके व स्वच्छतेचा वसा घेणारे गाव म्हणून दगडवाडीचा परिसरात लैकिक आहे. त्याचबरोबर पाणलोट क्षेत्रात काम करणारे गाव म्हणूनही परिचित आहे. परंतू आज 'आदर्श कुटूंब' स्पर्धेच्या माध्यमातून या गावाने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेवरून नजर टाकल्यास अनेक योजनांची फलश्रुती असल्याचे जाणवते. यासाठी या गावचे सरपंच श्रावण डोईफोडे व गजानन घुगे याची कल्पकता व मेहनत महत्वाची आहे. यावर्षी सहदेव ओंकार घुगे, शंकर नामदेव जायभाये व त्र्यंबक जायभाये यांच्या कुटुंबांना आदर्श कुटुंब पुरस्कार मिळाला आहे. गावकर्‍यांनी गावकर्‍यांसाठी सुरु केलेल्या या अभिनव योजनेत नागरिकांनी स्वयंस्फुर्त सहभागी होणे व पुरस्कार प्राप्त करणे इतरांसाठी आदर्शच ठरले आहे. हे गाव एवढयावरच थांबले नाही. तर बचत गटाची मोठी फळी या गावाची जमेची बाजू आहे. गावात महिला व पुरुषांचे एकूण ३५ च्या वर बचत गट विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. यात सर्वात जास्त काम त्यांनी पाणलोट क्षेत्रात केले आहे. नागरिकांनी बचतगटाच्या माध्यमातून केलेल्या पाणलोटच्या कार्यामुळे २० द्राक्ष बागासह ४० फळबागा डौलाने अभ्या आहेत. पूर्वी सिंचनाच्या पाण्यासाठी भटकंती करणारे दगडवासिय आता बागा फुलवत आहेत. गावातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून पाणलोट विकासात खुप मोठी कामे केली आहेत, यामुळे पाण्याच्या पातळीत खूप मोठी वाढ झाली आहे. महिलांना प्रोत्साहन म्हणून गावात १२५ गॅस सिलेन्डरचे वाटप करण्यात आले. इंडोजर्मन प्रकल्पाच्यावतीने कुटूंबाला स्वच्छ पाणी मिळावे यासाठी गावात वाटर-फिल्टर पूरविण्यात आले. गावात राबविण्यात येत असलेल्या सर्व विकास कामांत व योजनांत महिलांचा सक्रीय सहभाग ही या गावाची दुसरी जमेची बाजू आहे. दुसरे म्हणजे नागरिकांच्या विकासांच्या कक्षा वाढाव्यात यासाठी इतर आदर्श गावांना सहली काढून तेथील विकास कामाची पाहणी करण्याचा उपक्रमही गावकरी नित्यनेमाने राबवित असतात. ही किमया एका दिवसाची निश्चितच नाही. या मागे गावकर्‍यांची मेहनत व एकी आहे. गावाचे नाव दगडवाडी असले तरी गावात विकासाचा झंझावात आहे. आता या गावाचे नाव जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पोहचले आहे. दगडवाडीच्या 'आदर्श कुटूंब' उपक्रमाचे राज्यातील सर्वच गावांनी अनुकरण करायला काहीच हरकत नाही. 'जे जे (गावच्या विकासासंबधी) आपणाशी ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन' या संत वचनाची अनुभूती दगडवाडीत आली.
रवी गिते

No comments:

Post a Comment