Saturday, May 29, 2010

' एक गाव राहुड'


ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हयात प्रथम आलेल्या राहुड तालुका खामगावच्या सरपंचाचा दूरध्वनी आला...राहुडला लोकराज्य ग्राम करायचे आहे... आपण भेट द्यायला या. लोकराज्य हा जिव्हाळयाचा विषय असल्यामुळे तात्काळ राहुडची वाट धरली.

खामगाव येथून अवघ्या दहा बारा कि.मी. अंतरावर असलेल्या राहुडची प्रगती डोळ्यात भरण्यासारखीच आहे. ग्राम स्वच्छता अभियानानं राज्यातील अनेक गावांच भाग्य बदललं. राहुड त्या पैकीच एक. आदर्श ग्राम, स्वच्छ ग्राम, निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव या योजना तर राहुड वासियांनी यशस्वी केल्याच पण मुलींच स्वागत करणारं गाव.. म्हणूनही या गावानं जिल्हयात नाव कमावलं आहे. जन्मलेल्या मुलीच्या नावानं हजार रुपयाचं बचत पत्र देण्याचा अभिनव उपक्रम राहुडच्या कौतुकात भर घालणाराच आहे. मोठमोठ्या गावांना ज्या बाबी शक्य आहेत पण केल्या जात नाहीत त्या योजना व कल्पना राहुड वासीय अतिशय योग्य पध्दतीनं राबवितात तेव्हा त्यांच्या कार्याचा गौरवच होतो.

राहुडमध्ये पाय ठेवताच गावाच्या समृध्दीची कल्पना येते. स्वच्छ सुंदर घरं, सांडपाण्याचे नियोजन, घरोघरी कचरा कुंड्या हे या गावाचं वैशिष्ट आहे. सुमारे १७०० लोकसंख्या असलेल्या राहुडची वाटचाल स्वच्छतेकडून समृध्दीकडे अशीच म्हणावी लागेल. गावातील नागरिकांनी एकत्र येवून शासनाच्या उपक्रमाचा फायदा घ्यायचे ठरविल्यास काय होवू शकते याचे उत्तम उदाहरण राहुडमध्ये पाहायला मिळाले.

गावात प्रवेश करताच सर्व प्रथम दर्शन व्हायचे ते हागणदारीचे आम्ही सर्व प्रथम हागणदारी मुक्त गावाचा प्रयोग राबविला, असे सरपंच लक्ष्मणराव देशमुख सांगतात. गावातील पारंपारिक गढीच्या पायथ्याशी महिला-पुरुष शौचास जात असत. ही गावासाठी चांगली गोष्ट नव्हती. आम्ही घर तेथे शौचालय ही योजना राबविली. आणि पाहता पाहता गावातील स्त्री-पुरुषांनी उघडयावर शौच्यास जाणे बंदच केले. ज्या ठिकाणी हागणदरी होती, त्या ठिकाणी सुंदर बाग तयार केली. पाच सहा वर्षापूवी आपण राहुडला आला असता तर या ठिकाणी उभे राहण्याची इच्छा होत नव्हती. पण आज आपण या बागेत बसत आहोत. असे सरपंच अभिमानाने सांगत होते. यामुळे गाव हागणदारी मुक्त झाले व निर्मलग्राम पुरस्कार मिळाला.

गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास इच्छुक असतात. पण त्यांना शासकीय पातळीवरुन प्रोत्साहन मिळायला हवे. राहुडी या बाबतीत नशीबवान आहे. गट विकास अधिकारी बी. आर. मांडीवाले यांनी राहुडला दत्तक घेतल्यासारखेच आहे. गावच्या विकासाचा आराखडा ते स्वत: तयार करतात. प्रत्येक बाबतीत जातीने लक्ष घालतात. निधी बाबतही स्वत: पुढाकार घेवून पाठपुरावा करतात. त्याचाच परिणाम म्हणजे राहुड ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हयात प्रथम आले.

तालुका स्पर्धेतून सुरु झालेला राहुडचा प्रवास आता थंडावणार नाही. कारण गावकर्‍यांना स्वच्छतेचे महत्व पटले आहे. विद्यार्थ्यांनाही अभियानाचा उद्देश पटला आहे. पदाधिकारी, अधिकारी, गावकरी, स्त्री-पुरुष, विद्यार्थी सर्वांना वाटते राहुड राज्यात चमकले पाहिजे. हा उत्साहच गावच्या विकासाचा केंद्र बिंदू आहे. स्वच्छता अभियानांतर्गत शाहु-फुले-आंबेडकर दलितवस्ती सुधार अभियानातही या गावाने बक्षिस पटकावून एकोप्याचा संदेश दिला. गावात सामाजिक सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्यासाठी सर्व समाजाचे सण, उत्सव सार्वजनिक पध्दतीने साजरे करण्याची नवी परंपरा या गावाने सुरु केली आहे.

गाव केवळ स्वच्छता अभियान राबवून स्वस्त बसले नाही तर गावकर्‍यांना ओळखपत्र, आरोग्य स्मार्टकार्ड व मुलीच्या जन्माचे स्वागत या अभिनव कल्पना गावात राबविल्या जातात. मुलींचा घटता जन्मदर चिंतेची बाब असल्याची जाणीव गावकर्‍यांना खूप आधीपासूनच आहे. त्यासाठीच गावातील कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीच्या पालकांना एक हजार रुपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात येवून क्रांतीज्योती कन्यारत्न पुरस्काराने गौरविण्यात येते. एखाद्या लहानशा गावातील गावकरी इतका मोठा पुरागामी विचार करत असतील ही कल्पनाच अभिनव वाटणारी आहे.

सुंदर शाळा अवती-भवती सुंदर बगीचा, परसबाग, अतिशय रमणीय वातावरण व विकासाचा ध्यास यामुळे येथील शाळेलाही साने गुरुजी स्वच्छ शाळेचा पुरस्कार मिळाला. गावाच्या विकासातील महत्वाचा अडसर असतो ते गावातील रस्त्यावर येणारे सांडपाणी कुठल्याही गावाला विद्रुप करणारी ही महत्वाची समस्या असते. पहिले ही समस्या सुटली की बाकी कामे सोयीस्कर होतील असे येथील नागरिकांनी ठरविले व त्यातूनच साकारली सांडपाणी नियोजनाची भुमिगत गटार योजना. भूमिगत गटार योजना व गावातील सिमेंटच्या रस्त्याची सगळी कामे गावाला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून करण्यात आली. पैशाचा विनियोग व गावाचा विकास असा हा संगम आहे.

गावातील भूमिगत गटारचे पाणी गावाबाहेर तीन हैदात एकत्रित करण्यात येते. ते तेथेच फिल्टर करुन जनावरांच्या पिण्यासाठी वापरण्यात येते. यामुळे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. एवढेच नव्हे तर, लोकवर्गणी करुन पाणी साठविण्यासाठी शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. प्रायोगिक तत्वावर शाळेच्या छतावर रेन वॉटर हार्व्हेस्टींग करण्यात आले. स्वच्छतेचे व विकासाचे महत्व जाणल्यानेच हे घडले. जिल्हास्तरावर प्रथम आल्याने नागरिकांचा उत्साह व्दिगुणीत झाला आहे.

आता विभागीय स्पर्धेसाठी तयारी सुरु आहे. त्यासाठी गावकर्‍यांनी काही नवे संकल्प हाती घेतले आहेत. गावात मोकळया जागेत ऑक्सीजन पार्क उभारण्यात येणार आहे. शिक्षणाचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गावातील एकही मुल शाळाबाह्य राहू नये यासाठी जून महिन्यात संपूर्ण गावकरी झटणार आहेत. प्रत्येक महिन्यात एक दिवस सर्व गावकरी मिळून सामूहिक स्वच्छता मोहीम राबविणार आहे. पावसाचा थेंब न थेंब अडविण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.

या सार्‍या योजना व कल्पना गट विकास अधिकारी मांडीवाले, सरपंच देशमुख व ग्रामसेवक गिर्‍हे यांनी आखल्या असून राहुडला मॉडेल व्हिलेज करण्याचा संकल्प केला आहे. शासन व प्रशासन एकत्रित आले तर कसा विकास साधला जातो हे पाहायचे असेल तर एकदा राहुडला भेट द्यावीच लागेल. गावच्या विकासात महिलांचे योगदान महत्वाचे असते. राहुड मध्येही महिला यात मागे नाहीत. कर्ते पुरुष कर्तव्यासाठी बाहेर गेल्यावर गाव स्वच्छ सुंदर ठेवण्याचं काम महिलाच करतात असे सरपंच अभिमानाने सांगतात. एकंदरित राहुडची वाटचाल स्वच्छतेकडून समृध्दीकडे होत असून राहुडचा आदर्श जिल्हयातील अनेक गावांनी घ्यावा असाच आहे.
रवि गिते

Sunday, May 23, 2010

नागरिकांची सनद


शासकीय योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीत लोकजागृतीला महत्वाचे स्थान आहे. लोकाभिमुख शासन व्यवस्थेचा कणा असलेल्या सामान्य नागरिकांना शासन आपल्यासाठी काय करते हे थेट त्यांच्यात जाऊन सांगितले तर शासनाप्रती नागरिकांची विश्वासार्हता वाढते. शासन नेहमीच लोककल्याणकारी योजना राबवीत असते परंतु त्या ज्यांच्यासाठी आहेत त्यांच्यापर्यत थेट पोहचत नाहीत असा सूर नेहमीच असतो. ही बाब ओळखून चिखली जिल्हा बुलडाणा येथील उपविभागीय अधिकारी वासंती माळी व तहसिलदार प्रा. संजय खडसे यांनी नागरिकांची सनद तयार केली आहे. वरवर पाहता ही केवळ पुस्तिका वाटत असली तरी या सनदेच्या माध्यमातुन तहसिल कार्यालयच नागरिकांपर्यंत नेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.


तहसिल कार्यालयात नागरिक दररोज आपल्या अनेक कामासाठी येत असतात. साध्या साध्या कागदासाठी नागरिकांना अनेक चकरा माराव्या लागतात. एवढे करुनही काम होईलच याची शाश्वती नसते. ही बाब तहसिदार खडसे यांनी वर्षभर अभ्यासली व त्यातूनच नागरिकांची सनद निर्माण झाली.


शासकीय योजनांची मार्गदर्शक पुस्तिका असलेली ही सनद म्हणजे परिपूर्ण दस्ताऐवज म्हणावा लागेल. या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये उत्पन्नाचे प्रमाणपत्र, हैसियत प्रमाणपत्र, शिधापत्रिका, वास्तवांचे प्रमाणपत्र, जन्ममृत्यु नोंद आदेश, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, हॉटेल परवाना मिळविण्यासाठीचा अर्ज, कार्यक्रम परवान्यासाठीचा अर्ज, संजय गांधी निराधारसाठीचा अर्ज, विधवा स्त्री साठीचे अनुदान, आदीबाबतचे अर्ज दिलेले आहेत. ही सर्व कागदपत्रे नागरिकांना तहसिल कार्यालयात एका तासात उपलब्ध करुन देण्याचा मानस खडसे यांनी बोलून दाखविला. नागरिकांची सनद पालकमंत्री मनोहर नाईक यांच्या उपस्थितीत नागरिकांना अर्पण करण्यात आली.


प्रतिज्ञापत्रासाठी नागरिकांनी बर्‍याचदा जास्त पैसे मोजावे लागतात. ही बाब लक्षात घेता तहसिल कार्यालयाच्या वतीने अगदी माफक दरात प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची सोयही केली जाणार आहे. प्रतिज्ञापत्रात मजकूर काय असावा याचा उल्लेख नागरिकाच्या सनदमध्ये असून नागरिकांनी स्वच्छ हस्ताक्षरात प्रतिज्ञापत्र लिहिल्यास वेंडरचा खर्चही वाचू शकतो. नागरिकांच्या सनदेचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी लागणार्‍या कागदपत्राचे नमुने यात समाविष्ट आहेत. या सगळया कागदपत्रांच्या नमुन्यांचे फ्लेक्स तयार करुन तहसिल कार्यालयात लावण्यात येणार आहेत. नागरिकाची ही सनद तालुक्यातील प्रत्येक तलाठयाकडे उपलब्ध करुन देण्याची योजना तहसिल कार्यालयाची असून ज्याद्वारे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांच्या कागदपत्रांसाठी पायपीट करावी लागणार नाही.


बारावी व दहावीचे निकाल लागल्यानंतर जातीचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचे दाखल्यासाठी विद्यार्थ्याची मोठी गर्दी तहसिल कार्यालयात होणार आहे. हे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थ्याना या सनदेचा खुप मोठा फायदा होणार आहे. तहसिलदार खडसे यांनी घरपोच जातीचे प्रमाणपत्र हा उपक्रम राबवून जवळपास एक हजार विद्यार्थ्याना जात प्रमाणपत्र वितरित केले आहेत. नागरिकांची सनद तयार करुन त्यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम खर्‍या अर्थाने राबविला आहे. नागरिकांनी या सनदेचा पुरेपुर फायदा घेतला तरच नागरिकांची सनद नागरिकांना पोहचली असे म्हणता येईल.
रवि गिते

Wednesday, May 19, 2010

शासनाच्या योजना लोकराज्यच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवाव्यात - प्राजक्ता लवंगारे


लोकराज्य सर्वदूर पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबविण्यात आलेल्या लोकराज्य घरोघरी मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या अधिकार्‍यांचा महासंचालक प्राजक्ता लवंगारे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.मंत्रालयातील मिनी थिएटर येथे दोन दिवस माहिती अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयेजन करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या संचालक, उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकार्‍यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संचालक (माहिती) प्रल्हाद जाधव, संचालक (माहिती)(प्रशासन) श्रद्धा बेलसरे, संचालक नागपूर विभाग भि.म.कौसल आदी उपस्थित होते.एकूण वर्गणीदार या विभागस्तरीय गटामध्ये सर्वात जास्त वर्गणीदार करुन उद्दिष्ट पूर्ण करणारे पुणे विभागाचे उपसंचालक वसंत शिर्के, कोकण विभागाचे उपसंचालक देवेंद्र भुजबळ तसेच अमरावतीचे उपसंचालक बी.एन.गवारी, औरंगाबादचे प्रभारी संचालक तथा उपसंचालक लातूर प्रमोद गवळी यांचा यावेळी गौरव करण्यात आला.लोकराज्यच्या वर्गणीदारांचे उद्दिष्ट पूर्ण करणार्‍या १५ जिल्हा माहिती अधिकार्‍यांनाही यावेळी गौरविण्यात आले. त्यामध्ये विजय पवार (रायगड-अलिबाग ), संभाजी गायकवाड (सोलापूर), सखाराम माने (सातारा), किरण मोघे (नांदेड), राजेंद्र सरग (पुणे), अनिल गडेकर (अमरावती), अनिल आलुरकर (यवतमाळ), नितीन मोकळ (जालना), ज्ञानोबा ईगवे (बीड), रवी गिते (बुलडाणा), विवेक खडसे (अ.का.) (भंडारा), प्र.रा.मुराळकर (ठाणे), गोविंद अहंकारी (औरंगाबाद), चंद्रकांत क्षीरसागर (अ.का.) (गोंदिया) आणि अंबादास म्याकल (हिंगोली) यांचा समावेश आहे.

तसेच संभाजी गायकवाड (सोलापूर), सखाराम माने (सातारा), म.ठ. गावित (जळगाव), डॉ.किरण मोघे (नांदेड), विवेक खडसे (अ.का.) (भंडारा), उत्तम मुंजाळे (अहमदनगर), दयानंद कांबळे (कोल्हापूर) आणि चंद्रकांत क्षीरसागर (गोंदिया) या १० पेक्षा जास्त गावे लोकराज्य ग्राम करणार्‍या अधिकार्‍यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

तसेच लोकराज्य घरोघरी मोहीम राबविताना लोकराज्य शाळा हा उपक्रम राबविणारे बुलडाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. लोकराज्य वर्गणीदार मोहिमेचे हे सातत्य कायम ठेवून शासनाच्या योजना लोकराज्यच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांना महासंचालक प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी मार्गदर्शन केले. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.