Monday, August 16, 2010

प्रेरणादायी लोकराज्य शाळा


लोकराज्य शाळा ही संकल्पना राज्यात सर्वप्रथम बुलडाणा जिल्हा माहिती कार्यालयाने राबविली आहे. शहरापासून जवळच असलेल्या कोलवड येथील विद्या विकास विद्यालय या शाळेला राज्यातील पहिली लोकराज्य शाळा होण्याचा बहुमान मिळाला.या कार्यक्रमास सर्वदूर प्रसिध्दी मिळाल्याने जिल्हयातील इतर शाळांनीही लोकराज्य शाळा बनविण्याचा संकल्प केला. बर्‍याचशा शाळा लोकराज्य शाळा झालेल्या आहेत. त्यापैकीच एक उर्‍हा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा...

ही शाळा जिल्ह्यातील नामवंत शाळेपैकी एक शाळा आहे... याचे कारण म्हणजे त्या गावातील शिक्षक, पालक, गावकरी यांनी एकत्रितपणे केलेले वैविध्यपूर्ण प्रयत्न. या गावाबद्दल बर्‍याच पत्रकार मित्रांकडून तसेच इतर कार्यालयातील सहकारी अधिकार्‍यांकडून खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे मी लागलीच उर्‍हा गावाचा दौरा आखला.

बुलडाणा जिल्हयातील मोताळा या तालुक्याच्या गावापासून २७ कि.मी. अंतरावर उर्‍हा हे गाव. सकाळी आठ वाजेच्या आसपासचं गावात पोहचलो. कॅमेरामन, फोटोग्राफर यांना सोबतीला घेतले होते. आम्ही गाडीतून उतरताच आमच्याभोवती गावकर्‍यांनी गर्दी केली. सरपंच बालमुकूंद पाटील यांनी आम्हाला ग्रामपंचायतीकडे नेले. मस्तपैकी गरमा-गरम पोहे खाल्ले आणि त्यानंतर फक्कडसा चहा झाला. चहा नाश्त्याचा कार्यक्रम सूरू असतानाच गावकर्‍यांशी गप्पाही चालूच होत्या. त्यातून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, गाव छोटं असलं तरी गावकर्‍यांची अभिरुची, जीवन जगण्याची कल्पना अफलातून सुंदर आणि वाखणण्याजोगी आहे.

सरपंच बालमुकूंद पाटील यांनी जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चवथी पर्यंतची आदर्श शाळा निमार्ण केली आहे. त्याविषयी मी त्यांना विचारले असता ते म्हणाले, विविध नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अंकुश राठोड, सहाय्यक शिक्षक प्रदीप बयेस व राजेंद्र भोई या तरूण शिक्षकांनी खूपच मेहनत घेतली आहे. या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अंगी असलेल्या सृजनशिलतेचा कल्पकतेने वापर करून नियोजनपूर्वक विविध उपक्रमांची आखणी करून आम्ही सर्वांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी केली. या सार्‍याचे फलित म्हणून शाळेला साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धेत २००७-०८ या वर्षामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. हे समजल्यावर मी शेकहॅन्ड करीत त्यांचे अभिनंदन केले, आणि त्यानंतर आम्ही शाळेकडे निघालो.

शिक्षक, सरपंच आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून स्वच्छ, सुंदर व हिरवी शाळा म्हणून या शाळेची ओळख बनली आहे. शाळेच्या आवारात पाऊल टाकताच सुंदरशी रंगरंगोटी झालेली ती शाळा नजरेत भरते. शाळेच्या भिंतीवर शिक्षणाचा अर्थ, मुल्य संवर्धन तक्ता, विविध नकाशे, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, भारताचे संविधान, वंदेमातरम, पसायदान, दैनिक परिपाठ तसेच स्वच्छतेच्या संदेशाबाबतची बोलकी चित्रे रंगविली आहेत. ही चित्रे बघण्यात मी गुंग झालो. अन् इतक्यातच मुख्याध्यापक अंकुश राठोड, नमस्कार सर ! म्हणत माझ्या जवळ आले. मी त्यांना शाळा इतकी सुंदर केल्याबद्दलचे कॉम्पलीमेंट्स देऊन शाळेबद्दलची आणखी माहिती विचारली.

त्यांनी उत्साहाने सांगायला सुरुवात केली. या शाळेत वृक्षारोपण व संवर्धन, रेन हार्वेस्टींग, शाळेच्या समोर कमान असून या कमानीवर गट पध्दती, स्वयंशिस्त , सुंदर शाळा, हिरवी शाळा, तंटामुक्त शाळा, ज्ञानकुंड, शालेय मंत्रीमंडळ, परिपाठ मंडळ, विद्यार्थी स्वच्छता समिती, आरोग्य शिक्षण कोपरा, गणित व विज्ञान कोपरा, वाचन कोपरा इत्यादी उपक्रम राबविले जातात. याच्या पाटय़ा शाळेत त्या त्या ठिकाणी लावलेल्या दिसत होत्या.

शाळेतील वर्गासमोरुन जाताना एक गोष्ट लक्षात आली की, या शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र नळ व्यवस्था असून प्रत्येक वर्गासमोर नळ आहे. शालेय परसबाग आहे. वर्ग रचना गट पध्दतीची असून हुशार विद्यार्थ्यांना गट प्रमुख बनविले आहे.

सर्व शिक्षा अभियानाचा शाळेला झालेल्या उपयोगाबाबत इतर शिक्षकांनी दिलखुलासपणे सांगितले की, सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणार्‍या शिक्षक अनुदानातून आम्ही शैक्षणिक साहित्य तयार करून रचनाबध्द पध्दतीने लावले. याचा लाभ विद्यार्थ्यांना सुमारे ८३ टक्के ज्ञान डोळयांनी मिळू लागण्यामध्ये झाला.

शाळेतील एकूणच स्वच्छता पाहून सहज लक्षात येत होते की, शाळेत स्वच्छतेला अतिशय महत्व दिले जाते. याशिवाय शाळेच्या मुख्य कार्यालयातून सूचना देण्यासाठी व परिपाठ घेण्यासाठी ध्वनीक्षेपण यंत्रणेचा वापर केला जातो. शिवाय ही शाळा घंटामुक्त असल्याने विद्यार्थी वक्तशीरपणा, काटेकोरपणे पाळतात. कचरा टाकण्यासाठी शाळेत कचराकुंडी, विद्यार्थ्यांनी थुंकीने पाटी पुसु नये म्हणून बादलीत पाणी भरलेले असते. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी विविध साहित्य पुरविले जाते. शाळेत मुतारी व शैचालयाची व्यवस्था असून हात धुण्यासाठी रुमाल व साबण ठेवलेले आहेत. अशा विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर असलेली ही शाळा आदर्श न ठरली तर नवलचं... या शाळेने राबविलेले सर्व उपक्रम पाच राज्यात राबविण्याचा विचार होऊ लागला आहे, असे झाल्यास हा जिल्हयाचा गौरवच होईल. असे माझ्या मनात आले. सरपंच, मुख्याध्यापक व शिक्षक , विद्यार्थी या सर्वांचे मन:पूर्वक कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्वांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. प्रवासात एकच विचार सुरु होता, असे उपक्रम सर्वच शाळांमध्ये राबविण्यास सुरवात झाल्यास उद्याच्या पिढीचा पाया आणखी भक्कम होण्यास निश्चितच बळ मिळेल यात शंकाच नाही...

  • रवी गिते
  • No comments:

    Post a Comment